24 परगणा जिल्ह्यात दोन जण ठार
बराकपोरे – पश्चिम बंगाल मध्ये राजकीय हिंसाचार सुरूच असून काल राज्यातील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात कंकीनारा भागात करण्यात आलेल्या बॉंम्बस्फोटात दोन जण ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बॉंबफेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप तृणमुल कॉंग्रेसने केला असून ठार झालेले कार्यकर्ते हे तृणमुल कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते असे त्यांनी म्हटले आहे.
महंमद मुख्तार आणि महंमद हलिम अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तृणमुल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्योतिप्रिया मल्लिक यांनी आरोप केला की या भागातील लोकांनी तृणमुल कॉंग्रेसला मतदान केल्यामुळे भाजपने भाडोत्री गुंड आणून हा हल्ला केला.
तथापी भाजपचे खासदार अर्जुन सिंग यांनी हा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले की हा राजकीय हिंसाचार नाही. कौटुंबिक भांडणातून हा प्रकार झाला आहे त्याचा राजकारणाशी काहीं संबंध नाही असे त्यांनी म्हटले आहे. सोमवार आणि मंगळवारच्या रात्री एक वाजण्याच्या सुमाराला बारूईपारा मध्ये हा प्रकार घडला. दरम्यान तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी आमच्या एका कार्यकर्त्याची हावडा जिल्ह्यात हत्या केल्याचा आरोप भारतीय जनतापक्षाने केला आहे. जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने आपल्या या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली असे भाजपचे म्हणणे आहे.