नगर महामार्गावर पाण्याची तळी : वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
वाघोली – पुणे- नगर रस्ता रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. याच रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी लोणीकंद पोलिसांनी सोडवली आहे. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे नगर रस्ता जलमय होऊ लागला आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे बनले आहे. पोलीस रोज होणाऱ्या पावसात कोंडी होऊ नये म्हणून एकीकडे उपाययोजना करीत आहेत. दुसऱ्या बाजूला वाहतूक कोंडीसाठी जबाबदार इतर विभाग मात्र हात वर करीत आहेत.
तत्कालीन लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, प्रताप मानकर यांनी वाघोलीमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्वाची कामगिरी केली होती. लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एम. हाके यांनी जास्तीचे पोलीस दल, वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे ग्रामपंचायतीच्या मदतीने काढून वाहतूक कोंडीमुक्त परिसर बनवला आहे. पण गेल्या चार दिवसांत वाघोली परिसरात पाऊस जास्त झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे अचानक वाहतूक कोंडी वाढू लागली आहे. एकीकडे रस्त्यावरचे पाणी काढून वाहतूक सुरळीत करण्यात पोलीस मग्न झाले आहेत. नगर रस्त्यावरून ये- जा करताना पोलीस कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी दररोज पाणी काढून वाहतूक सुरळीत करताना दिसू लागले आहे. पुणे मनपालगत खांदवेनगरपासून ते बकोरी फाटापर्यंत पावसाचे पाणी जाण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही.
पावसाचे पाणी काढण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीएच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
– संदीप सातव, माजी उपसरपंच, वाघोली.