पुणे – प्रवाशांची मागणी, गरज आणि अपेक्षित उत्पन्न विचारात घेऊन नवे मार्ग निश्चित करणे, मार्गात बदल, सुरू असेलल्या मार्गाचा अभ्यास करून वाहतूक नियोजन व संचलनामध्ये सुसूत्रता आणि समन्वय साधण्यासाठी पीएमपी प्रशासनाने समिती गठीत केली आहे. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी बीआरटी प्रमुख अनंत वाघमारे असणार आहेत. तर, सदस्य म्हणून वाहतूक व्यवस्थापक, मुख्य अभियंता, खातेनिहाय चौकशी अधिकारी, आयटीडीपी सल्लागार, संबंधित आगार व्यवस्थापक काम पाहणार आहेत. समितीची महिन्यातून एकदा बैठक घेण्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सेवा पुरवली जाते. शहराबरोबरच शिक्रापूर, सासवड, पाबळ फाटा, आळंदी यासारख्या ग्रामीण भागातही पीएमपीकडून सेवा दिली जाते. मात्र, सेवा पुरवण्यात येणारे मार्ग तोट्यात असूनही प्रवाशांच्या सेवेसाठी याठिकाणी बससेवा सुरू आहे. तर, अनेकदा प्रवाशांनी मागणी केल्यास संबंधित ठिकाणी बस उपलब्ध करून दिली जाते. मात्र, दिवसेंदिवस वाढता खर्च आणि तुलनेत कमी उत्पन्न यामुळे पीएमपी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.
त्यामुळे आता नव्याने मार्ग सुुरू करण्यासाठी मागणी केल्यानंतर त्या मार्गावरील प्रवासी संख्या, अपेक्षित उत्पन्न, उपलब्ध बसेस याचा अभ्यास करुन मार्गनिश्चिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मार्ग, वेळापत्रकामध्ये बदल, फिडर सेवेचे नियोजन आदी नियोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.