वाई – दिवसेंदिवस ढासळत चाललेला पर्यावरणाचा समतोल, बेसुमार होत असलेली झाडांची कत्तल या पार्श्वभूमीवर शिवसह्यादी आणि भटकंती परिवाराने वाई तालुक्यात केंजळगावर वृक्षरोपणाची मोहीम राबवत समाजाला पर्यावरण वाचविण्याचाच संदेश दिला आहे.
या दोन्ही परिवारांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सातारा जिल्ह्यातील गडकोटांवर दुर्ग संवर्धनाची चळवळ चालू करण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून किल्ले केंजळगड येथे वृक्षारोपण आणि संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. वाई वनविभागाच्या सहकार्याने झाडांची रोपे घेण्यात आली. सुरुवातीला शिवसह्याद्री करिअर अकॅडमी आणि भटकंती सह्याद्री परिवार यांच्या सदस्यांकडून संपूर्ण गडाची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर गडावरील पूर्व माचीवर वृक्षारोपण करण्यात आले.
पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक गडकोटावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय परिवारांकडून घेण्यात आला आहे. तसेच वाई तालुक्यात ही मोहीम राबविण्यासाठी वाई वनविभागाच्या मदतीने प्रबोधन करण्यात येणार आहे. हजारो झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे शिवसह्याद्री करिअर अकॅडमीचे राजेंद्र खरात यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मोहिमेतील सदस्यांनी माचीवर असणाऱ्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता केली. भटकंती सह्याद्रीची परिवारामार्फत गडावर संवर्धनाची दिशा ठरविण्यात आली. या मोहिमेत राजेंद्र खरात, अनिल वाशिवले, सौरभ जाधव, अजय वाशिवले, प्रवीण कदम, सिद्धेश सूर्यवंशी, शुभम चव्हाण, गणेश वाशिवले, प्रमोद कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.