ओझर्डे – केंद्र व राज्य सरकारच्या भटकंती करणाऱ्या मेंढपाळांसाठी चारा छावणी, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, धनगर समाज उघोजक, कौशल्य विकास निधी, आदिवासी प्रमाणे शैक्षणिक सवलती अशा योजना सातारा जिल्ह्यातील मेंढपाळाच्या विकासासाठी राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती खा. विकास महात्मे यांनी धनगर समाज संघर्ष समिती शाखेच्या उद्घाटन प्रंसगी वळकुंदेवाडी (ता. वाई) येथे दिली.
यावेळी सचिन जायभाये, भूषण शिंदे, गणेश वळकुंदे (अध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती सातारा) हिंदूराव हाके, राजू गोरे, श्रीरंग खरात, सचिन जागळे, धनंजय वळकुंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
खा. महात्मे म्हणाले, राज्य सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी 1000 कोटी निधीची तरतूद केली. ही गोष्ट धनगर समाजाच्या हितासाठी अतिशय महत्त्वाची आहे. धनगरांचा विकास होण्यासाठी खऱ्या अर्थाने आता सुरुवात झालेली आहे. या आर्थिक निधीमुळे घरकूल, शिष्यवृत्ती, वस्तीगृह, शेती साहित्य, भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन, बार्टीसारखे प्रशिक्षण केंद्र, शेळी-मेंढी उद्योजक व कौशल्य विकास महामंडळ, इत्यादी सुविधा मिळणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील धनगर समाजाने संघटित झाले तर बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत याठिकाणी सत्ता मिळणार आहे. भाजप सरकारच्या माध्यमातून आरक्षण मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील भटक्या मेंढपाळासाठी विमा संरक्षण योजना सरकार तयार करणार आहे.