आराखडा तयार करण्यासाठी सुधार समितीचे गठन
नगर: शहराचा विकास करण्यासाठी आराखडा तयार असेल तर त्या प्रमाणे विकास कामे करणे सोयीचे होते. शहराच्या विकासामध्ये शहरातील उद्योजक, आर्किटेक्ट, इंजिनिअर, डॉक्टर, वकिल, सामाजिक शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असेल तर शहराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यास मदत होईल. याकरिता शहर सुधार समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या अनुषंगाने आपल्या सुचना व विचार याचा विकास कामांसाठी निश्चित उपयोग होईल त्यामुळे आपल्या सुचना महत्वाच्या आहेत. शहर विकासासाठी त्याचा निश्चित उपयोग होईल. शासनाकडून मनपास 100 कोटी निधी प्राप्त झालेला आहे. आणखी निधी शासनाकडून मिळणार असल्याने त्याचे नियोजन आपल्या माध्यमातून अगोदरच करणे योग्य होईल. असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शहर सुधार समितीची बैठक घेतली. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, सभागृह नेतेस्वप्नील शिंदे, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, उपायुक्त प्रदीप पठारे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, अभियंता बल्लाळ, मेहेत्रे, निंबाळकर, पारखी, आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना महापौर म्ह्णाले, समितीमध्ये सदस्यांची संख्या जास्त आहे. तसेच वेगवेगळया क्षेत्रातील सदस्य असल्यामुळै शहराचा विकासाचे नियोजन करण्यासाठी चार ते पाच टिम तयार करून त्या माध्यमातून काम केल्यास आपल्या कामास गती येईल असे मला वाटते. त्यामध्ये पर्यटन, उद्यान विकास, चौक सुशोभिकरण, सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम, रस्ते विकास अशा प्रकारे टिम तयार करण्यात येतील. त्यामध्ये सदस्यांची नेमणुक करण्यात येते. त्यांनी त्याबाबतीतच काम करावयाचे आहे.
यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे म्हणाल्या की, उदयानामध्ये जॉगिंग ट्रेॅक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचणी येतात. त्याबाबतीत विचार करणे योग्य होईल तसेच शहरातील वाढती रहदारी पाहता पार्किगच्या समस्यावर देखील विचार करणे आवश्यक आहे.
सभागृह नेता स्वप्नील शिंदे यांनी, शहरातील हॉस्पीटल मंगल कार्यालय, बाजारपेठ या ठिकाणी नागरिकांची मोठया प्रमाणात वर्दळ असते सदर ठिकाणी पार्किगची व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे.असे सांगितले.
यावेळी उपस्थित सदस्यांमधून इंजिनिअर संजय पवार, प्रकाश जैन, रोहित साळुंके, माजी नगरसेवक जयंत येलूलकर, सलिम शेख, अशोक मवाळ, अशोक सातकर यांनी सूचना केल्या त्यामध्ये, नविन प्राजेक्ट राबविण्यापेक्षा जुन्या असलेल्या उद्यान, रस्ते, सांस्कृतिक भवन, या ठिकाणी नूतनीकरण करून कमी निधीमध्ये ते विकसित केले तर शहराच्या चेहरा बदल्यास मदत होईल. वृक्षारोपणामध्ये औषधी झाडांची लागवड केल्यास त्याचा फायदा नागरिकांना होईल. पर्यावरण, पाणीपुरवठा, घनकचरा, उद्यान वाहतूक या बाबींचा विचार करून त्याप्रमाणे नियोजन करणे आवश्यक आहे. सिध्दीबाग, महालक्ष्मी, गंगा उद्यान या ठिकाणी निधी वापरून चांगल्याप्रकारे विकसित केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल. चौक सुशोभीकरण किंवा उद्यान विकसित करण्यासाठी उद्योजक तयार असतात या कामासाठी आमच्यावर जर जबाबदारी दिल्यास उद्योजकांशी चर्चा करून शहरातील चौक व ओपन स्पेस विकसित करून घेणे सोपे होईल. शहरामध्ये वाहतुक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी पार्किगची व्यवस्था होणे आवश्यक आहे. सॅनिटरी, बाधकाम, सिनानदी सुशोभीकरण, शहरामध्ये प्रवेशद्वार आदी बाबींचा विचार करून त्याबाबतचा प्लॅन करणे आवश्यक आहे.
यावेळी उपायुक्त सुनील पवार म्हणाले की, सर्व मान्यवरांनी आपापले विचार मांडले शहराच्या विकासासाठी निश्चितच त्याचा विचार होणार आहे. मनपात काम करित असताना एखादे काम सुचविल्यास त्याच्यावर मतांतर होवून काम होण्यास अडचण निर्माण होतात. शहराच्या विकासासाठी डीपी असणे आवश्यक आहे. त्याच बरोबर सिडीपी (सिटी डेव्हलपमेंट प्लॅन) तयार करून महासभेपुढे ठेवल्यास कोणत्या वर्षात कोणती कामे करावयाची ते निश्चित करता येईल.
शहर विकास आराखडा तयार करताना 100 कोटी रूपये मनपास प्राप्त झालेले आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधांवर खर्च देखील अपेक्षित आहे. त्यामध्ये पाणी, ड्रेनेज, गटर, रस्ते अशा बाबींचा विचार करणे अपेक्षित आहे. आपण केलेल्या सुचनांचा शहर विकासाच्या दृष्टिने निश्चित उपयोग होणार आहे.