तळेगाव दाभाडे – पर्यटनासाठी मित्रांसोबत धरणावर फिरायला आलेल्यांपैकी एकाच बुडून मृत्यू झाला. कासारसाई धरण कुसगाव (पवन मावळ) रविवारी (दि. 30) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या हद्दीत घडली. धरणाची सुरक्षा रामभरोसे असून, पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ होत असल्याने नदी, धरण परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
अभिषेक गोपालप्रसाद गुप्ता (वय 24, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी पुणे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. गणेशकुमार चंद्रमोहन झा (वय 23, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी, पुणे) यांनी शिरगाव पोलीस चौकीत माहिती दिली.
पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुट्टी असल्याने रविवारी (दि. 30) दुचाकीवरून गणेशकुमार झा, अभिषेक गुप्ता, अभिषेक विश्वकर्मा, निलेश जीवने, कोमल देहनकर, शेपाली पारधी आदी मित्र कासारसाई धरण परिसरात कुसगाव पमा हद्दीत फिरण्यासाठी आले होते. त्यातील अभिषेक गुप्ता व अभिषेक विश्वकर्मा पोहण्यासाठी धरणात उतरले. खबर देणार गणेशकुमार झा यांना पोहण्यासाठी बोलावले असताना अभिषेक गुप्ता याला पोहताना दमछाक झाली. गटांगळ्या खात असल्याने गुप्ता याला वाचविण्याच्या प्रयत्न केला, पण पाणी खोल असल्याने रविवारी सायंकाळी पाण्यात बुडाला.