सदाशिव खाडे यांचे सूतोवाच : मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती
चिंचवड – मागील अनेक वर्षांपासून वाल्हेकरवाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या प्राधिकरणाने अधिग्रहण केलेल्या जमिनीच्या बदल्यात परतावा म्हणून साडे बारा टक्के जमीन परत मिळावी, ही प्रलंबित असणारी मागणी लवकरच पूर्ण होणार असून नियमानुसार बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा परतावा मिळेल, असे मत प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी येथे केले. वाल्हेकरवाडी येथील लक्ष्मीनगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
प्रेरणा बॅंकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, पुणे जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एकनाथराव टिळे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेविका संगीता भोंडवे, नगरसेवक नामदेव ढाके, सुरेश भोईर, दिलीप काटे आदी उपस्थित होते.
खाडे पुढे म्हणाले की आघाडी सरकारने जाणीवपूर्वक प्राधिकरणाला अध्यक्ष म्हणून कोणाची ही नेमणूक केली नसल्याने मागील 20 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. परंतु आता लोकनियुक्त अध्यक्ष केल्याने शहरातील प्राधिकरणाचे प्रलंबित असणारे सर्व प्रश्न सुटणार आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काचा परतावा त्यांना मिळावा या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून येत्या अधिवेशना नंतर लागलीच हा प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले.