पिंपरी – विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रे दरम्यान तलवारी घेवून समाजात तेढ निर्माण होईल, अशा घोषणा देत मिरवणूक काढणाऱ्या कार्यकर्त्यांवर व आयोजकावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष शरद इनामदार, कार्यध्यक्ष धनाजी शिंदे व नितीन वाटकर यांच्या नेतृत्वाखाली समाजात तेढ निर्माण होईल, अशा घोषणा देत व हातात तलवारी घेवून सुमारे 250 कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली होती. अशा प्रकारांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
जाणिवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार असून असा प्रकार करणाऱ्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व आरएसएस सारख्या संघटनावर वेळीच बंदी घालावी, अशी मागणी निवेदनाद्वारे तायडे यांनी केली आहे. या निवेदनावर देवेंद्र तायडे, बापू गायकवाड, अरुण रंधवे, संतोष निसर्गंध, बाळासाहेब वरगले व उमाकांत गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.