दापोडी – दिवसाआड पाणी त्यातही अपुऱ्या दाबाने मिळणारे पाणी यामुळे सांगवी, पिंपळे गुरववासिय त्रस्त असताना पिंपळे गुरव मधील नेताजी नगर लेन दोन व लागून असलेल्या राजीव गांधी नगर रस्त्यावर जलवाहिनीची गळती होऊन हजारो लिटर पाणी वायाला जात आहे.
सांगवी, पिंपळे गुरवमध्ये गेल्या तीन दिवसांपूर्वी पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे टाकीतून पाणी वाया गेल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आता परिसरात महापालिका ठेकेदाराकडून विविध ठिकाणी रस्ते दुरुस्ती व चेंबर बसवण्यासाठी खोदकाम केले जात आहे.
काटे पुरम चौक गेल्या तीन महिन्यांपासून वाहतुकीच्या कोंडीच्या विळख्यात सापडा आहे. या परिसरातील नेताजी नगर येथील गल्ली क्रमांक दोनच्या शेवटी व राजीव गांधीनगर लागून असलेल्या रस्त्यावरील नळजोड असलेल्या जलवाहिनीतून पिण्याच्या पाण्याची गळती होत आहे. या भागात सायंकाळी सात नंतर पाणी पुरवठा होत असल्याने महापालिका कर्मचारी व इतर कुणाला याबाबत माहिती मिळत नाही. त्यामुळे दुरुस्ती रखडली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या भागाला सध्या एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. हा पाणी पुरवठा देखील अपुऱ्या दाबाने होत आहे. त्यामुळे सोसायट्यांवर टॅंकर मागविण्याची वेळ आली आहे. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना दुसरीकडे रस्ते व अंतर्गत चेंबर दुरुस्तीसाठी खोदकाम केल्याने अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटून पाणी गळती होत आहे. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुरू असलेली ही पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी होत आहे.