टाकवे, कान्हेजवळील इंद्रायणी पुलासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर
टाकवे बुद्रुक – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित कान्हे ते टाकवे रस्त्यावर असलेल्या इंद्रायणी नदीवरील पुलासाठी 9 कोटी रुपयांचा निधी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात अखेर मंजुर करण्यात आला राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत नामदार संजय बाळा भेगडे यांनी पुलासाठी निधी मिळवला दरम्यान कान्हे टाकवे रस्त्यावरील ब्रिटिशकालीन पुल सध्या धोकादायक स्थितीत असल्याने काही काळासाठी यापुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे टाकवे हद्दीतील बहुतांश कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत.
आंदर मावळातील 40 ते 45 गावासह लहान-मोठ्या वाड्यवस्तीवरील लोकाचा हाच मार्ग असल्याने पुलाचा प्रश्न अधिक गंभीर बनला होता. या पुलाच्या मागणीकरिता सेवा फाउंडेशनच्या वतीने आंदर मावळमधील सर्व ग्रुप ग्रामपंचायत, दवाखाने, शाळा कंपन्यांमार्फत मुख्यमंत्री कार्यालय, खासदार, आमदार, रस्ते बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर सर्वस्तरातून केलेली मागणी पूर्ण झाल्याने आंदर मावळातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
“कान्हे-टाकवे इंद्रायणी नदीवरील पूल करावा यासाठी आम्ही शासन दरबारी सातत्याने प्रयत्न केले. या मागणीकरीता वडगाव येथे सेवा फाउंडेशनच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. त्याचवेळी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आम्हाला दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला.
– अनिल जाधव, अध्यक्ष, सेवा फाउंडेशन.