-शहरातील वृक्ष लागवडीची निश्चित माहिती नाही
-2003-04 मध्ये होते सुमारे 17 लाख वृक्ष
पिंपरी – महापालिकेतर्फे भौगोलिक माहिती प्रणालीचा (जीआयएस) वापर करून शहरातील झाडांची गणना करण्याचे काम सध्या सुरू आहे. पुढील वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे. वृक्षगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर जास्त ऑक्सिजन देणारी झाडे, औषधी वनस्पती यांचे नेमके प्रमाण कळू शकणार आहे.
तसेच, पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक झाडांचे रोपण करणे शक्य होणार आहे. दरम्यान, पुढील तीन महिन्यांमध्ये शहरात विविध ठिकाणी सुमारे दीड लाख रोपांची लागवड करण्याचे नियोजन ठरले आहे. त्यामध्ये सर्वाधिक एक लाख रोपांची लागवड लष्कराच्या हद्दीत केली जाणार आहे.
शहरामध्ये आत्तापर्यंत सुमारे 25 लाख झाडे लावण्यात आली असल्याची उद्यान विभागाची माहिती आहे. नेमका आकडा निश्चित नाही. शहरातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय सप्टेंबर 2017 मध्ये झालेल्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला. जानेवारी 2018 मध्ये प्रत्यक्ष कार्यादेश देण्यात आले. दोन वर्ष कालावधीत ही वृक्षगणना पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वृक्षगणनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन केले आहे.
शहरात आत्तापर्यंत लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली, याचा नेमका आकडा वृक्षगणेनेचे काम पूर्ण झाल्यानंतर समजू शकणार आहे. त्याशिवाय, विभागनिहाय, प्रभागनिहाय झाडांची नेमकी संख्या समजु शकेल. जुन्या आणि नव्याने लावलेल्या झाडांची माहिती कळणार आहे. नवीन गृहप्रकल्पांच्या बांधकामात येणाऱ्या झाडांची संख्या समजेल.
वृक्षगणनेत प्रत्येक झाडाचे छायाचित्र आणि माहिती संकलित केली जात आहे. औषधी वनस्पती किती, अधिक ऑक्सिजन देणारी झाडे कोणती, याची माहिती देखील या वृक्षगणनेद्वारे स्पष्ट होईल. यापुर्वी 2003-04 मध्ये झालेल्या वृक्षगणनेत शहरात सुमारे 17 लाख झाडे लावण्यात आल्याची आकडेवारी समोर आली होती. गेल्या 16 वर्षांमध्ये शहरातील झाडांमध्ये किती वाढ झाली, याबाबतचे चित्र सध्या सुरू असलेल्या वृक्षगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
दीड लाख रोपांची होणार लागवड
यावर्षी नव्याने दीड लाख रोपे लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने लष्कराच्या हद्दीतील जगताप डेअरी येथील उड्डाणपुल ते पुणे जिल्हा रूग्णालय, रूग्णालयापासून पिंपळे सौदागर बीआरटी रस्ता या अंतरातील मोकळ्या जागेत 35 हजार रोपे लावण्यात येतील. दिघी बीईजी सेंटरच्या जागेत दिघी ते चऱ्होली या अंतरात रस्त्याच्या कडेने 35 हजार रोपे लावण्यात येणार आहे. त्याशिवाय, रूपीनगर ते निगडी जकातनाका या अंतरात येणाऱ्या लष्कराच्या हद्दीतील मोकळ्या जागेमध्ये 30 हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. रस्त्याच्या कडेने, मोकळ्या जागांमध्ये, स्मशानभूमि, दफनभूमि, मैदाने, शाळा, पाण्याच्या टाक्या, धार्मिक ठिकाण, मंडई, उद्यान आदी ठिकाणी 30 हजार रोपे लावण्यात येणार आहे.