पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नदीपात्रालगतची पुराचे पाणी नागरवस्तीत शिरण्याची ठिकाणे व त्यासह अन्य उपाययोजनांबाबतचा सविस्तर आपत्ती व्यवस्थापन आराखडा स्वतंत्रपणे जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करा, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला दिल्या आहेत.
मान्सूनपूर्व तयारी बैठक व जिल्हाआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली. त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांच्यासह महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल तसेच प्रशासन व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या सूचना
-नदीपात्रालगतच्या भागांमध्ये पाणी शिरणारी ठिकाणे निश्चित करा
-पाणी शिरणाऱ्या भागातील रहिवाशांच्या स्थलांतराचा आराखडा तयार करा
-सर्व जुने पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट
-नदीपात्रातील अतिक्रमणांवर कारवाई
-31 मेपर्यंत सर्व बाबींचा एकत्रित आराखडा सादर करावा
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी काळे यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह झाडे उन्मळून पडून मनुष्य व वित्तहानी होऊ नये, यासाठी धोकादायक वृक्षांची छाटणी करावी, महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेल्या आपत्तीजनक घटनांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी. नदीपात्रालगत, पात्रातील झोपटपट्ट्या व इतर धोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करून उपाययोजना ठरवाव्यात, नदीपात्रातील गाळ व जलपर्णी काढणे तसेच धोकादायक जागांचे सर्वेक्षण करावे. गटार सफाई आणि औषध फवारणी करावी, अशा सूचना काळे यांनी यावेळी दिल्या आहेत.
पुणे हा पुरप्रवण जिल्हा असून पूर परिस्थितीमध्ये आपत्ती घटना घडल्यानंतर रिस्पॉन्स टाईम (प्रतिसाद कालावधी) हा कमीत कमी कसा राहील, याची जबाबदारी विभाग प्रमुखांची राहणार आहे. तसेच प्रत्येक विभागांनी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा.
हा आराखडा 31 मे पर्यंत जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा. आराखडा सादर न करणाऱ्या विभागांवर कारवाई करण्यात येणार असून, दुर्दैवाने एखादी घटना घडल्यास त्या विभागांना जबाबदार धरले जाणार असल्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.