आळंदी – इंद्रायणी नदीवरील बंधाऱ्यांमधून आळंदी शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, नदीत प्रचंड प्रमाणात वाढलेली जलपर्णी व तीव्र उन्हाळ्यामुळे पाणीसाठा कमालीचा खालावला आहे. त्यातच इंद्रायणी नदीच्या दुतर्फा शेतीसाठी शेतकऱ्यांनी मोटारी लावून 24 तास पाण्याचा उपसा केला जात असल्याने पाणीसाठा अत्यल्प शिल्लक असल्याने हा साठा केवळ 15 दिवसच पुरेल असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
आळंदी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापासून सिद्धबेट, केळगाव, चिंबळी हद्दीपर्यंत संपूर्ण इंद्रायणी नदीवर जलपर्णी प्रचंड प्रमाणात वाढली असून, ती पावसाळ्यापूर्वीच काढणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून बंधाऱ्याच्या गळतीमुळे पाणी गळती सुरू असल्याचे दिसून येत होते.
मात्र, ही गळती शुक्रवार (दि. 10) पासून बंद झाल्याने व अति प्रमाणात वाढलेल्या जलपर्णीमुळे बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने शुक्रवार पालिकेच्या नगराध्यक्ष वैजंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, शिवसेना नेते उत्तम गोगावले, उपमुख्याधिकारी राम खरात, पाणीपुरवठा विभाग प्रमुख दत्तात्रय सोनटक्के तसेच पाणीपुरवठा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची तातडीची बैठकबोलावून आळंदीकरांना दिल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्या विषयी विचारविनिमय करण्यात आला. तर शनिवारी नगराध्यक्षा उमरगेकर, माजी नगरसेवक अशोक कांबळे-उमरगेकर, राम खरात, नगरसेवक समीर कुऱ्हाडे, तुषार धुंडरे, उत्तम गोगावले, दत्तात्रय सोनटक्के आदींनी आळंदी बंधारा ते चिंबळीपर्यंत जाऊन इंद्रायणी नदीची पाहणी केली.
त्यावेळी नदीत प्रचंड प्रमाणात वाढलेली जलपर्णी, दोन्ही बाजूने लावण्यात आलेल्या मोटारी व कमी झालेली पाण्याची पातळी अशी अवस्था दयनीय अवस्था दिसून आल्याने आळंदीकरांना केवळ 15 दिवसच पाणीपुरवठा करता येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांनी पाणी अतिशय काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.