सासवड शहराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या असून राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या पुढाकारातून आज या प्रश्नी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. शिवतारे यांच्या मागणीनुसार नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात ही बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
वीर धरणातील सासवडच्या जॅकवेलकडे जाणारी चारी ही उथळ असल्याने विहिरीत पाणी जात नाही. त्यामुळे चारी खोल करून लोखंडी पाइपद्वारे पाणी जॅकवेलमध्ये आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शिवतारे यांनी केली होती. यावर नगरपालिकेने तसा प्रस्ताव सादर करावा त्यावर कार्यवाही केली जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सांगितले. या योजनेतील पंप जवळपास 15 वर्ष जुने झाले असल्याने सतत नादुरुस्त होत असतात. त्यामुळे हे पंप नवीन द्यावेत आणि वीजबिल वाचवण्यासाठी शासनाने आम्हाला सौर उर्जेवर पंप चालविण्यासाठी आवश्यक प्रणाली शासकीय खर्चातून द्यावी असे शिवतारे यांनी सुचविले. त्यावर नगरविकास राज्यमंत्र्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला याबाबतचे अंदाजपत्रक व परिपूर्ण प्रस्ताव तयार करावा आणि त्याची प्रत मुख्यमंत्री, नगरविकास राज्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांना सादर करावी असे निर्देश दिले आहेत. नगरविकास राज्यमंत्री यांच्यानंतर सासवड पाणीप्रश्नी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडेही बैठक पार पडली.