मुंबई: मतदान मोजणीच्या दिवशी व्हीव्हीपॅट मशीनमधल्या मतपावत्या प्रथम मोजण्याची मागणी सत्ताधारी पक्ष सोडल्यास इतर सर्व पक्षांनी केली होती. सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा व्हीव्हीपॅट मशिनची मतमोजणी आणि नंतर ईव्हीएम मशीनची मतमोजणी केली जावी, असे निर्देश दिले आहेत. प्रश्न ईव्हीएमचा नाही, प्रश्न जिंकण्याचा किंवा पराभूत होण्याचा नाही तर देशात लोकशाहीप्रती विश्वास निर्माण करण्याचा करण्याचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.
ईव्हीएम मशीन मध्ये जी फेरफार होत आहे, त्यामुळे देशात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. जर लोकांच्या मनात शंका निर्माण होत असेल तर निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की, त्यांनी विश्वासाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. परंतु निवडणूक आयोग ज्याप्रकारे व्यवहार करत आहे त्यामुळे लोकांच्या मनातील शंका अजुन वाढू लागली आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.