धुळे – माझ्या मुख्यमंत्रीपदाविषयी लोकच निर्णय देतील असे युवासेनेचे अध्यक्ष अदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. सध्या जनआशिर्वाद यात्रेवर असलेले अदित्य ठाकरे यांना तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहात काय असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर त्यांनी हे उत्तर दिले. ते म्हणाले की सध्या माझी प्राथमिकता लोकांचा आवाज ऐकून घेणे आणि त्यांना दिलेली आश्वासने पुर्ण करणे ही आहे. भाजप -सेना युती सत्तेवर आली तर अदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होतील असे विधान शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी केले होते. त्या अनुषंगाने अदित्य ठाकरे यांना हा प्रश्न विचारण्यात आला असा त्यावर त्यांनी हे उत्तर दिले.
ते म्हणाले ही एकच अशी गोष्ट आहे जी माझ्या हातात नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणे योग्य नाही. लोकांनीच त्यावर निर्णय द्यायला हवा. आज माझ्या हाताता एकच गोष्ट आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्यावेळी लोकांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करणे आणि ते काम मी करीत आहे. लोकांचे आभार मानण्यासाठी आपण ही यात्रा काढली असून ज्यांनी आम्हाला मते दिली नाहीत त्यांचे मतपरिवर्तन करण्याचाहीं प्रयत्न आपण यातून करणार आहोत. आम्ही सत्तेवर असो किंवा नसो शिवसेना कायम लोकांच्या बरोबरच राहिली आहे आणि राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
या यात्रेच्या दरम्यान एका शैक्षणिक संस्थेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका विद्यार्थ्याने तुम्हाला शिक्षण मंत्री व्हायला आवडेल काय असा प्रश्न विचारला होता. त्याला मात्र त्यांनी होय असे उत्तर दिले. देशातील राजकारणात गृहमंत्रालयाला महत्व दिले जाते पण शिक्षण मंत्रालय हेही एक महत्वाचे मंत्रालय असून मला याल विभागात काम करायला आवडेल असे ते म्हणाले.