बीड: बीड लोकसभा मतदारसंघाचे संयुक्त महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारानिमित्त परळी इथे झालेल्या सभेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच बीडच्य़ा पालकमंत्री आणि विद्यमान खासदार यांच्यावर कडाडून टीका केली. ज्यावेळी लाखोंच्या साक्षीने बजरंग सोनवणे यांचा अर्ज दाखल केला तेव्हाच भाजपाची पायाखालची वाळू सरकली. बीड जिल्ह्याला जाणीव झाली आहे की मोठ्यांच्या मागे पळून चालणार नाही. आपली कामे ही सामान्या माणसाकडूनच पूर्ण होतील. बजरंग सोनवणे हेच आपल्या कामांची पुर्तता करु शकतात हे लोकांनी ओळखले आहे, असे वक्तव्य मुंडे यांनी केले.
बीड जिल्ह्यांने मुंडे भगिनींवर विश्वास दाखवला, त्यांना अनेक जबाबदाऱ्या दिल्या. पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता मिळूनही त्यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही, अशी टीका मुंडे यांनी केली.
१. रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना बीड मध्ये का आणता आला नाही?
२. परळी – मुंबई ट्रेन का सुरू करता आली नाही?
३. झारखंडच्या खासदारांनी परळी वैद्यनाथ येथील शिवलिंग नेले त्यावेळी आपण काय करत होता?
४. वैद्यनाथ कारखान्यावर साडेसहाशे कोटींचं कर्ज कोणी केलं?
५. चारवेळा रस्त्याचे भूमीपूजन करूनही परळी ते आंबाजोगाईपर्यंतचा रस्ता का करता आला नाही?
असे प्रश्न उपस्थित करत मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावर टीका केली. बजरंग सोनवणे हे शेतकरी पूत्र आहेत, सर्वसामान्यांमधून वर आलेले नेतृत्व आहे, अशा या आपल्या भूमीपूत्राला देशाच्या संसदेत पाठवा, असे आवाहन मुंडे यांनी उपस्थितांना केले.