पिंपरी – राज्यातील महापालिकांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नागरिकांच्या तक्रारींची सोडविण्यासाठी लोकशाही दिन आयोजित करावा, असा आदेश राज्य सरकारने दहा वर्षापूर्वी दिला होता. मात्र, सद्यस्थितीत महापालिकेला लोकशाही दिनाचा विसर पडला असल्याचे दिसत आहे. माहिती अधिकारातंर्गत पालिकेने लोकशाही दिनाबाबत “निरंक’ असे लिहून
दिले आहे.
जागरुक नागरिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेरी म्हणाले, सुरुवातीच्या काळात प्रत्येक महिन्याच्या सोमवारी शहरातील नागरीक महापालिकेतील प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना तक्रारी सादर करत होते. यानंतर, अधिकाऱ्यांनी या तक्रारी नियमात बसत असल्यास निकाली काढणे व आयुक्तांकडे सुनावणीसाठी पाठविणे अपेक्षित आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमाला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र, कालांतराने महापालिकेने तक्रारी कमी येत असल्याचे कारण दिले आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सुरु केलेल्या लोकशाही दिनाबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.