आमदारांनी नव्हे भाजपाने प्रश्न सोडविले
पिंपरी – शहरातील नागरिकांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर शहरातील तीन आमदारांमध्ये श्रेयवाद चांगलाच रंगला आहे.
या श्रेयवादामध्ये आता पक्षनेते एकनाथ पवार यांनी उडी घेतली असून हे प्रश्न आमदारांनी नव्हे तर भाजपाने सोडविल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपातील श्रेयवादाचा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्राधिकरणाच्या जागेवरील अतिक्रमण, स्पाईन रोड बाधित घरे आणि प्राधिकरणातील साडे बारा टक्के परताव्याचे प्रलंबित प्रश्न माझ्यामुळेच सुटल्याचा दावा शहरातील आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्याबरोबरच प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी देखील केला आहे.
याबाबत या चारही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र पत्रके काढत, याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. तसेच या सर्वांचेच वेगवेगळ्या ठिकाणी सध्या सत्कार सोहळेदेखील सुरु आहेत. सध्या भाजपा आमदार आणि खाडे यांच्यात सुरू असलेल्या श्रेयवादाबाबत सभागृहनेते एकनाथ पवार यांना विचारले असता ते म्हणाले, या चारही पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ही वस्तुस्थिती आहे. मात्र प्रश्न केवळ भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमुळे सुटला आहे. आमदारांचा आणि खाडे यांचा दावा यावेळी पवार यांनी खोडून काढत प्रश्न सुटल्याचे श्रेय त्यांनी पक्षाला दिले. पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे श्रेयवाद आणि पक्षांतर्गत वाद पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे.