बारामती – पार्थ याचा पराभव आमच्यासाठी निश्चितच धक्कादायक आहे. आम्ही मावळात मोठी मेहनत घेतली होती. त्यावेळी जाणवलेली स्थिती खूपच सकारात्मक होती. परंतु, केवळ मावळातच नव्हे तर संपूर्ण देशात मतदारांनी दिलेला कौल वेगळाच आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मावळ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज प्रथमच अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, निवडणुकीत विजय आणि पराभव हा ठरलेलाच असतो. परंतु, तुम्ही अपयशाने खचून जाऊ नका. विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागावे. कोणी काहीही म्हंटले तरी भाजपला एवढे यश मिळेल, असे कोणालाच वाटत नव्हते. किंबहुना, असे यश मिळेल याची खात्री त्यांनाही नव्हती. शहरी भागाबरोबरच ग्रामिण भागातील जनतेनेही पुन्हा भाजपच्या बाजुने कौल दिला, यामुळेच त्यांचे अभिनंदन. जनतेने जो काही कौल दिला आहे, तो आम्हाला मान्य आहे. पुढील पाच वर्षांसाठी काम करण्यास आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.