वासुंदे – दौंड तालुक्यातून जाणाऱ्या पालखी महामार्गाच्या कामाचा सरकारला विसर पडल्याचे दिसून येत आहे. पुणे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चार पदरी करण्याचे निश्चित केले, त्यासाठी सुरुवातीला भूसंपादन प्रक्रिया आणि कार्यवाही जलद गतीने झाली. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुकाची आचार संहिता जाहीर झाली आणि तेव्हापासूनच या कामात शिथिलता आली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गासाठी दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील जमिनीवर संपादन केले जाणार आहे. पाटस ते सराटीपर्यंत या 93 किलोमीटरच्या अंतरापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राजपत्र प्रसिद्ध करून मोजणी प्रक्रिया केली आहे. संबधित निवाडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जानेवारी महिन्यात पाठवले आले असून, आता जुलै महिन्याचा अखेरीस येत आहे तरीही अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम हे या कामासाठी भू-संपादन अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहेत. मात्र, बारामती उपविभागीय कार्यालयाचा कारभार लोकसभा निवडणुकीतील कामकाज व आगामी विधानसभा निवडणुकीचे कामकाज पाहता. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यापासूनच महामार्गाच्या कामांत शिथिलता आली असल्याने या कामासाठी स्वतंत्र भू-संपादन अधिकारी नेमण्याची गरज आहे.
या महामार्गाचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांसह जागामालक, उद्योजक यांना जवळपास सातशे ते नऊशे कोटीपर्यंत भरपाई द्यावी लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे. निधीची तरतूद होण्याची गरज आहे, भरपाई मिळाल्यानंतर जागा ताब्यात घेतली जाईल आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.
या महामार्गाच्या प्रश्नाबाबत माहिती घेण्यासाठी बारामतीतील उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीमधे आहे, याप्रश्नी उद्या बोलु असे सांगत नेहमीप्रमाणे माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.