नवी दिल्ली – महाराजा रणजित सिंह यांच्या पुण्यतिथी निमित्त काही भाविकांना दर्शनासाठी पाकिस्तानला जायचे होते. त्यासंदर्भात शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीने व्हिसासाठी 282 अर्ज पाठवले होते त्यापैकी केवळ 224 जणांना व्हिसा देण्यात आला. तर 58 जणांचा व्हिसा नाकारण्यात आला आहे. ज्या भाविकांना व्हिसा नाकारण्यात आला त्यांनी एसजीपीसी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली.
यासंदर्भात एसजीपीसी सचिव मंजीत सिंह यांनी सांगितले की, आम्ही 282 शीख भाविकांच्या व्हिसासाठी अर्ज केला होता मात्र केवळ 224 जणांना व्हिसा देण्यात आला. तर उर्वरीत 58 जणांचा व्हिसा नाकारण्यात आला. हे शीख भाविक उद्या अट्टारी रेल्वे स्टेशनहून एका विशेष रेल्वेने पाकिस्तानला जातील. यावेळी व्हिसा नाकारण्यात आलेल्या भाविकांनी म्हटले की, ही व्हिसा पद्धतच बंद करायला हवी अशी आमची मागणी आहे.
भाविकांना व्हिसाशिवाय यात्रेस जाण्याची परवानगी असावी. धार्मिक स्थळांची यात्रा करण्यासाठी भारत- पाकिस्तान दरम्यान प्रोटोकॉल 1974 नुसार परवानगी देण्यात आली आहे. या करारानुसार भारतातून हजारो भाविक दरवर्षी धार्मिक उत्सव व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतात.