राजीव गांधी यांच्या विरोधातील टिप्पणी अमान्य
नवी दिल्ली -माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा दिल्ली विद्यापीठाच्या 200 हून अधिक प्राध्यापकांनी निषेध केला आहे. राजीव गांधी यांनी देशसेवा करताना सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी केली आहे, अशी भावना त्या प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे.
मोदींनी काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना बोफोर्स घोटाळ्याचा संदर्भ देत राजीव गांधी यांना लक्ष्य केले. स्वत:ला मिस्टर क्लीन म्हणवणारे एक नंबरचे भ्रष्टाचारी ठरले, अशी टिप्पणी मोदींनी केली. ती अमान्य करत दिल्ली विद्यापीठाच्या 207 प्राध्यापकांनी एक निवेदन जारी केले. मोदींनी गाठली तितकी खालची पातळी कुठल्याच पंतप्रधानांनी गाठली नव्हती. राजीव गांधी यांची कामगिरी देशाला माहीत आहे, असे नमूद करत त्या निवेदनात 1999 मधील कारगिल युद्ध आणि दूरसंचार क्रांतीची उदाहरणे देण्यात आली आहेत.
कारगिल युद्धाच्या खूप आधी राजीव गांधी शहीद झाले. मात्र, त्या युद्धातील यशानंतर भारतीय जवानांनी बोफोर्स तोफांबद्दल त्यांची प्रशंसा करणाऱ्या घोषणा दिल्या. राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळेच आपल्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) कंपन्या आगेकूच करत आहेत. दूरसंचार क्षेत्रामुळे देश जोडला गेला तो त्यांच्या धोरणांमुळेच. रेल्वे प्रवास सुकर झाला तो त्यांनी केलेल्या आरक्षणाच्या संगणकीकरणामुळेच, असे त्या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.