फारूक अब्दुल्लांचे टीकास्त्र: इम्रान यांच्या भूमिकेचे कौतुक
श्रीनगर –जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी बुधवारी भारताबरोबरच्या संबंधांबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. आपले पंतप्रधान अजूनही चहावाल्याच्या भाषेत बोलत आहेत, असे त्यांनी म्हटले.
युद्ध हा काश्मीर मुद्द्यावरील तोडगा नव्हे. चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो, असे इम्रान यांनी मागील वर्षी म्हटले होते. त्या भूमिकेचे स्वागत अब्दुल्ला यांनी येथील सभेत बोलताना केले. विकासाच्या अभावामुळे काश्मीर मुद्दा अस्तित्वात आलेला नाही. तो मुद्दा राजकीय स्वरूपाचा आहे. भारत आणि पाकिस्तानमधील चर्चेतूनच मार्ग निघू शकतो अशी आमच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची दीर्घ काळपासूनची भूमिका आहे. जम्मू-काश्मीरच्या जनतेने किती काळ सहन करायचे, असा सवाल त्यांनी केला. देशात इतरत्र निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठी मोदी सरकारकडून काश्मीरचा वापर केला जातो. त्याचे गंभीर परिणाम देशाच्या ऐक्यावर आणि अखंडत्वावर होऊ शकतात. त्यामुळे ते प्रकार थांबायला हवेत, अशी भूमिकाही अब्दुल्ला यांनी मांडली.