बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पोलिसांकडून तपासामध्ये त्रुटी ठेवल्याचा आरोप
नगर – राज्यात गोवंश हत्याबंदी असूनही जिल्ह्यात गोवंश कत्तलखाने मोकाट पणे सुरू आहेत. प्रशासनाने हे कत्तलखाने त्वरीत बंद करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी उत्तर नगर जिल्हा सहमंत्री विश्वहिंदु परिषदेचे प्रशांत बेल्हेकर, बजरंग दल सहसंयोजक सचिन कानकाटे, विशाल वाकचौरे, अश्विनकुमार बेल्हेकर, गोपाल राठी, आकाश राठी, कुलदिप ठाकुर, शुभम कपीले, नितीन गुंजाळ, गिरीष सोमाणी, आशिष ओझा, बंटी डापसे आदी उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यासह शहरात भारतनगर, हिम्मतनगर, जमजम कॉलनी, मोगलपुरा, कोल्हेवाडी रोड, अशा खेगवेगळ्या भागात कत्तलखाने सुरु आहेत. कत्तलीसाठी शहरालगत असलेल्या कुरण येथून भाकड गोवंश जनावरांचा पुरवा केला जातो. या गावातील व्यापाऱ्यांवर कधीही कारवाई होत नाही. तसेच संगमनेर पोलीसांनी आजवर केलेल्या कारवायांमध्ये जाणीवपूर्वक कमतरता ठेवल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
गुजरातमधून होतो जनावरांचा पुरवठा
संगमनेर शहरात सुरू असलेल्या कत्तलखान्यासाठी अनेक व्यापारी गुजरात मधून भाकड जनावरे आणून त्यांचा पुरवठा कत्तलीसाठी करतात. आजवर अनेकदा नाशिक येथील पोलिसांनी संगमनेरातील काही व्यापाऱ्यांची वाहने पकडून कारवाई केली आहे. मात्र संगमनेर पोलिसांकडून या गोष्टीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.
दरवेळी “पंटरची’ साखळी बदलून कत्तलखाने होतात सुरू
छाप्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास होत नाही. त्यामुळे एकच मालक वारंवार जागा बदलून कत्तलखान्याचा व्यवसाय करत आहे. मूळ मालक, जनावरांचा पुरवठादार, आर्थिक पाठबळ देणारी व्यक्ती, वाहतूक करणारी व विक्री करणारी व्यक्ती यांना कायद्याच्या कक्षेत घेतले जात नाही. त्यामुळे दरवेळी ही साखळी पंटर बदलून हा धंदा सुरुच ठेवत असल्याचे सांगण्यात येते.