पिंपोडे बुद्रुक – उत्तर कोरेगावातील पाणीटंचाईचे सावट दूर करण्यासाठी वसना उपसा जलसिंचन योजनेचे पाणी नांदवळ येथील धरणात सोडावे, तसेच वसना नदीवरील बंधारे भरण्यासाठी आवर्तन सोडण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांची कैफियत ऐकून घेतली होती. अनेक गावांनी पाणीटंचाईबाबत तक्रारी केल्या होत्या. येथील पदाधिकाऱ्यांनी पाणी टंचाईबाबत तक्रार केल्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने तातडीने आज सकाळी साडेआठ वाजता शिंदे यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, सरपंच नैनेश कांबळे, उपसरपंच अमोल निकम, भाजपाचे जिल्हा चिटणीस दीपक पिसाळ, अशोकराव लेंभे, विकास साळुंखे, गटविकास अधिकारी श्री. मगर, पाणीपुरवठा विभागाचे श्री. संत, ग्रामसेवक शशिकांत माने उपस्थित होते. टंचाई काळात टॅंकरने पाणीपुरवठा करणे ही तात्पुरती उपाययोजना असते. मात्र टॅंकरची गरजच पडणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. वसना योजनेचे पाणी नांदवळ धरणात सोडल्यास पिंपोड्यासह नांदवळ, सोळशी, नायगांव, सोनके या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.
त्यासाठी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी बोलून येत्या दोन दिवसात धरणात पाणी सोडून हा प्रश्न निकाली काढण्याचे आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच पिंपोडे हे गाव लोकसंख्येने मोठे असल्याने तेथील पाण्याची गरज लक्षात घेऊन सोनके येथून वसना योजनेचे पाणी नदीत सोडून बंधारे तातडीने भरून घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय टॅंकरचा पाणी पुरवठा सुरळीत होत आहे का याकडे ग्रामसेवकानी लक्ष देण्याच्या सूचना केल्या. यावेळी प्रमोद कदम, धनसिंग साळुंखे, हणमंत साळुंखे, सूर्यकांत निकम, अभिजित लेंभे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.