भाजपामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार वाढला-ममता
कोलकाता – भाजपमुळेच पश्चिम बंगालमधील हिंसाचार वाढीस लागला आहे. त्यामुळे भाजपाला विजयी रॅली काढू देणार नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले आहेत.
जूनच्या पहिल्याच आठवड्यात तृणमूल कॉंग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी या हत्या केल्याचे तृणमूलच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 24 परगाणा जिह्यात हत्या करण्यात आलेल्या निर्मल कुंडू यांच्या घरी जाऊन ममतांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यावेळी ममता म्हणाल्या, भाजपामुळेच पश्चिम बंगालमधील हिंसाचार वाढीस लागला आहे. भाजप विजयी रॅलीच्या नावावर हुगली, बांकुरा, पुरुलिया आणि मिदनापूरमध्येही हिंसा करत आहे. कोणी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्यास पोलिसांनी त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशा सूचनाच त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. त्यामुळे या विषयावरून प बंगालमध्ये नव्याने वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.