पहिल्या फेरीच्या लॉटरीत 67 हजार 716 विद्यार्थ्यांचा लागला होता नंबर
पालकांना जावे लागणार पडताळणी समितीकडे
पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गतच्या (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन भरलेल्या अर्जात दुरुस्त्या करण्यासाठी पालकांना येत्या 4 जूनपर्यंत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सन 2019-20 या चालू शैक्षणिक वर्षासाठी “आरटीई’च्या प्रवेशासाठी 9 हजार 195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 779 जागा दर्शविण्यात आल्या आहेत. यासाठी 2 लाख 44 हजार 934 अर्ज दाखल करण्यात आले होते. प्रवेशासाठी 8 एप्रिल रोजी राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली होती. यात 67 हजार 716 विद्यार्थ्यांचा नंबर लागला. या सर्वांना पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या मुदतीत 47 हजार 35 पालकांनीच आपल्या मुलांचे प्रवेश घेतले. उर्वरित 20 हजार 681 विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतले नाहीत. बहुसंख्य पालकांच्या अर्जात चुका झाल्या असून पाहिजे त्या शाळेत प्रवेश मिळत नसल्याने पालकांनी प्रवेशाकडेच पाठ फिरवली होती. प्रवेशाच्या पहिल्या फेरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी पालकांना गुगल लोकेशन व अर्जात दुरुस्ती करण्यासाठी पडताळणी समितीकडे जावे लागणार आहे. यासाठी बुधवार (दि.29) पासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी दिली आहे.
ज्या पालकांना पहिल्या फेरीत लॉटरी लागली; परंतु अंतराच्या अडचणीमुळे प्रवेश घेऊ शकले नाहीत, अशाच पालकांच्या तक्रारींची खात्री पडताळणी समितीने करणे, पालकांची चूक किंवा तांत्रिक चूक असल्यास गुगल लोकेशन व शाळा निवडीत दुरुस्ती करणे, ज्या पालकांनी घराचे अंतर 3 कि.मी.पेक्षा जास्त असताना जाणीवपूर्वक 1 कि.मी.च्या आत दाखविले असून त्यांना पडताळणी समितीने अपात्र ठरवले आहे, अशांची दुरुस्ती करण्यात येवू नये, असा सूचनाही चव्हाण यांनी दिल्या आहेत.
दुसऱ्या फेरीच्या लॉटरीची प्रक्रिया सुरू नाहीच
प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीच्या लॉटरीची प्रक्रिया अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. त्याचे वेळापत्रकही पोर्टलवर टाकण्यात आलेले नाही.