म्हसवडमध्ये नगराध्यक्ष वीरकर यांची विरोधकांवर टीका
म्हसवड – म्हसवड शहर व परिसरातील पालिकेचा नळ पाणी पुरवठा हा पाचच दिवसातून एकवेळ व भरपूर केला जात आहे. सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता सर्वत्रच पाणी टंचाई आहे, माण तालुक्यातील अनेक गावे टॅंकरच्या पाण्यावर असल्याने अनेक गावाची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
मात्र म्हसवड पालिकेच्या पाणी योजनेवरुन वाड्या वस्त्यासह शहरात व परिसरात आणि छावणीलाही पाणीपुरवठा सुरू आहे. तरीही विरोधी गटाचे नगरसेवक मात्र नगरपालिकेला बदनाम करत आहेत. दहा – बारा कार्यकर्ते गोळा करुन आंदोलनाचा बाऊ करत परिवर्तन आघाडीत बिघाडी करण्याचा विरोधकांचा डाव असून परिवर्तनचे पदाधिकारी त्यास कधीच भिक घालणार नाहीत, अशी टीका नगराध्यक्ष भगतसिंग उर्फ तुषार वीरकर यांनी केली. यावेळी उपनराध्यक्षा सौ. स्नेहल सूर्यवंशी, परिवर्तन आघाडीचे नेते युवराज सूर्यवंशी उपस्थित होत्या.
सताधारी परिवर्तन आघाडी व नगराध्यक्षांच्या कारभाराविरोधात आ. जयकुमार गोरे यांच्या गटाचे नगरसेवक अकिल काझी यांनी नुकतेच दहा ते बारा कार्यकर्त्यांसह पालिकेसमोर घंटा नाद आंदोलन करून पाणी आठ ते दहा दिवसांतून येते, सत्ताधारी पाणी विकत आहेत, असे आरोप केले. नगराध्यक्ष वीरकर म्हणाले, पाणी विकले जात असल्याचे विरोधकांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असून आरोप करणाऱ्यांनी आधी ठोस पुरावे द्यावेत आणि मग आरोप करावेत, केवळ प्रसिद्धीसाठी पालिकेला बदनाम करू नये. नागरिकांनीही विरोधकांचा डाव ओळखल्यानेच अवघे दहा ते बारा कार्यकर्ते घेऊन त्यांना आंदोलन करावे लागत आहे. विरोधकांच्या आरोपत तथ्य असते तर म्हसवडकर नागरिक आंदोलनात नक्कीच सहभागी झाले असते.
शहरातील पाण्याचे प्रत्येक प्रभागात शेड्युल तयार केले असून त्या रोटेशननुसार वाड्या व वस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्यासाठी दर महा तीन ते साडेतीन लाख रुपये वीजबिल नगरपालिका भरत आहे. महाराष्ट्र राज्यातील एकमेव ही तीस किलोमीटरवर लांबीची मोठी खर्चाची योजना वीस वर्षे सूरु आहे. मात्र केवळ प्रसिध्दीसाठी काही महाभाग आंदोलने करून व मोर्चा काढून नगरपालिका बदनाम करत आहेत.