कोलकाता – कोणे एके काळी पश्चिम बंगाल हा डाव्यांचा गड समजला जायचा. आता फक्त औषधापुरते डाव्यांचे अस्तित्व शिल्लक उरले आहे. बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा एकही उमेदवार जिंकला नाही, तसे एकाच उमेदवारला आपली अनामत रक्कम वाचवण्यात यश आले आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार माकपचे जाधवपूरचे उमेदवार बिकास भट्टाचार्य यांना अनामत रक्कम वाचवण्याएवढी मते मिळाली आहेत. तर दुसरीकडे भाकपच्या सर्व उमेदवारांच्या अमानत रक्कम जप्त झाल्या आहेत. अनामत रक्कम वाचवण्यासाठी उमेदवारला एकूण मतांपैकी 16 टक्के मते मिळवणे गरजेचे असते.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवारला 25 हजार रुपये रक्कम अनामत ठेवावी लागते तर अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी साडेबारा हजार तर अनुसुचित जमातीच्या उमेदवारला पाच हजार अनामत रक्कम भरावी लागते. बंगालमध्ये 34 वर्षे डाव्यांनी राज्य केले. माकपचे वरिष्ठ नेते मोहम्मद सलीम यांचेही निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यांना केवळ 14.25 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे डाव्या पक्षांच्या गोटात शांतता पसरली आहे.