पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील तीन धरणांमध्ये मिळून अवघा 6.02 टीएमसी म्हणजे 20.65 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 2.78 टीएमसी इतका पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे आता पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने तसेच समाधानकारक पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत ही चार धरणे 100 टक्के भरली. मात्र त्यानंतर परतीचा पाऊस समाधानकारक झाला नाही. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली. उन्हाळ्यात पाण्याचे वाढते बाष्पीभवन, शहराला पिण्यासाठी आवश्यक पाणी, शेतीसाठी लागणारे पाणी याचा विचार करून पिण्यासाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाटबंधारे विभाग यांच्यापुढे आव्हान असणार आहे.
खडकवासला धरणात 0.72 टीएमसी, पानशेत धरणात 3.36 टीएमसी आणि वरसगाव धरणात 1.93 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तर टेमघर धरणाची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असल्याने टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडून धरण लवकर रिकामे करण्यात आले. त्यामुळे टेमघर धरणात शून्य पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत खडकवासला धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येत आहे. हे पाणी 7 मेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील सात दिवसात आणखी अर्धा टीएमसी पाणी कमी होणार आहे.