सातारा – अंडाबुुर्जीच्या उधारीचे पैसे मागितल्याने दुकानदारांवर खुनी हल्ला केल्याची घटना साताऱ्यात घडली. याप्रकरणी विक्रम दिलीप साठे (रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा) यांनी सहा जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मौल्लाली जमादार डोंगरे, आलावक्षी लालासाहेब शेख, प्रकाश हनुमंत कांबळे, शरणाप्पा मलाप्पा कांबळे, अस्लम बन्शी सय्यद, शहेनशहा वली जमादार (सर्व रा. भीमाबाई आंबेडकरनगर, सदरबाजार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
साठे यांचा भीमाबाई आंबेडकरनगर येथे वडापावचा व्यवसाय आहे. त्या ठिकाणी संशयित मौल्लाली जमादार डोंगरे याने अंडाबुुर्जी खाऊन 495 रुपयांची उधारी केली होती. बुधवारी दि. 3 रोजी संशयित पुन्हा साठे यांच्या वडापावच्या गाडीवर वडापाव खाण्यासाठी आला. मात्र, यापूर्वीची उधारी दिल्याशिवाय वडापाव देणार नसल्याचे साठे यांनी सांगितल्याने संशयित व साठे यांच्यात वादावादीला सुरुवात झाली. त्यानंतर संशयिताने इतर मित्रांना बोलावून तक्रारदार यांच्यावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. यात तक्रारदार जखमी झाले असून जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष चौगुले करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी अस्लम बन्सी सय्यद यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित विशाल बाळू भिसे, प्रकाश शिर्के, विक्रम साठे, गणेश काळू देवकुळे, विशाल मोहिते व त्यांच्या अनोळखी सहा साथीदारांनी त्यांना मारहाण केली.
सय्यद यांचा भीमाबाई आंबेडकर नगर परिसरामध्ये वडापावचा गाडा आहे. तो गाडा त्या ठिकाणी लावायचा असल्यास आम्हाला फुकट वडापाव द्यावे लागतील, अशी संशयितांनी मागणी केली होती. त्यास सय्यद यांनी विरोध केल्याने संशयितांनी त्यांना मारहाण करुन त्यांच्या वडापावच्या गाडीचे नुकसान केले. तसेच रोख रक्कम बाराशे रुपये जबरदस्तीने चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करत आहेत.