रामदास बाबांची 150 वी पुण्यतिथी
150 वर्षांपासून अन्नदानाची एक अनोखी परंपरा
अकोले – दीड लाख चपात्या,11 हजार लिटर आमटी आणि असंख्य भाविकांची मांदियाळी भक्तिभावाने रामदास बाबांच्या 150 वी पुण्यतिथीला शनिवारी जमा झाले होते. गेले दीड शतक ही पुुण्यतिथी साजरी करणारे गावकरी व ज्याची पुण्यतिथी साजरी केली जाते ते निसर्ग पूजक रामदास बाबा हे खरोखरच आगळे वेगळे उदाहरण आहे. अकोले तालुक्यातील बदगी बेलापूर हे गाव तसे तालुक्याच्या सरहद्दीवर. नगर व पुणे या दोन जिल्ह्यातील राजकारण व समाजकारण कोळून प्यायलेले. पण या गावाच्या 900 उंबऱ्यापैकी घरटी एक दोन तरी कामाधंद्यासाठी मुंबईत राहत असलेले. हे मुंबईकर, अन्य ठिकाणी चाकरमानी असणाऱ्या व सासुरवाशिणी असणाऱ्या सर्वांनी शनिवारी रामदास बाबा पुण्यतिथीला भावूकपणे गर्दी केली होती.
दीडशे वर्षांपूर्वी बेलापूर गावात असाच एक योगी पुरुष होऊन गेला.गावाच्या पश्चिम बाजूला कच नदीच्या काठावर योगी रामदासबाबा राहत असत. ते ध्यान धारणा करून गोपालन करीत. वृक्ष लागवड व संवर्धन करत.या योगी पुरुषाला रिद्धी सिद्धी प्राप्त झाली होती. ते बोलेल तसे घडे अशी त्यांच्या बाबत कथा सांगितली जाते. आज गावात कुटुंब संख्या वाढली.गावकरी नोकरी धंद्यानिमित्ताने बाहेर गेले. तरी दीडशे वर्षांची परंपरा गावाने कायम ठेवली आहे. आणि त्याला अनुसरून 15 तारखेला हा उत्सव साजरा केला गेला. रामदास बाबा यांच्या पुण्यतिथीचा उत्सव दरवर्षी जेष्ठ द्वादशीला साजरा केला जातो.यानिमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण सांगता सप्ताह पार पडला.व त्या नंतर रामदास बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.
त्या नंतर चपाती-आमटी असा महाप्रसाद पंगत रंगली.तर सायंकाळी अश्व नृत्य व शिवकालीन दांडपट्टा, लाठ्या काठयांचे चित्तथरारक कार्यक्रम पार पडले. रामदास बाबांच्या 150 व्या पुण्यतिथी निमित्ताने अनोखे अन्नदान केले जाते.त्यात चपाती, आमटीचा प्रसाद दिला गेला. यावेळी आमटीसाठी चार लाख रुपयांचा मसाला लागला.जवळपास दीड लाख चपात्या व 11 हजार लिटर आमटी बनवली गेली.तर नऊशे घरांतून सरासरी दोनशे चपात्या घेऊन दीड लाख चपात्यांचा महाप्रसाद बनवला गेला होता. अकोले तालुक्याच्या दक्षिणेला बेलापूर (बदगी) गावात गेली 150 वर्ष अन्नदानाची एक अनोखी परंपरा सुरू आहे.
यंदा या सोहळ्यात चार लाख रूपयांचा मसाला वापरला. तसेच सहाशे किलो शेंगदाणा तेल वापरून 11 हजार लिटर आमटी केली गेली. तर नऊशे घरांतून किमान दीड लाख चपाती आली.विशेष म्हणजे संपूर्ण गावातील महिलानी याचे नियोजन केले होते.असे पोपटराव फापाळे म्हणाले. प्रत्येक पाहुण्यांना, भाविकांना,गावकरी सुना, लेकी बाळींना आग्रहाने वाढले जात होते. आमटीतील कढीपत्ता देखील भाविक खातात. त्यामुळे कचरा, खरकटे नावालाही दिसले नाही. यंदा रामदासबाबांच्या दीडशेव्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त गावाने लोकवर्गणीतून रामदासबाबांची प्रतिमा असलेली नऊशे चांदीची नाणी बनवली होती.त्याचे सर्वांना वाटप करण्यात आले.