वाई तालुक्याच्या ग्रामीण भागातील विदारक वास्तव
मेणवली – धरण क्षेत्रासह गावच्या तलावातील गाळ काढून गाव विकासाचे जलस्रोत निर्माण करण्याचे आवाहन स्वत: जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाला कसलाही प्रतिसाद वाई तालुक्यातील प्रशासनाकडून मिळाला नसल्याने एकंदरीतच जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचेच स्पष्ट होत आहे. दरम्यान, एप्रिल महिना संपला, आता मे महिन्याचेही पंधरा दिवस उलटून गेले मात्र एकाही गावात गाळमुक्त धरण अन् गाळयुक्त शिवार योजनेला वाईच्या महसूल विभागाला शुभारंभाचा महूर्त सापडला नसल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ही योजना कागदावरच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य शासनाच्यावतीने काही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून धरणातील व तलावातील गाळ काढण्याची मोहीम संपूर्ण जिल्ह्यात हाती घेण्यात आली आहे. गाळमुक्त शिवार योजना पूर्णतः बळीराजाच्या हिताची असून गावच्या तलावातील साचलेला गाळ काढल्यास पावसाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक होऊन तलावातील पाणी पातळी वाढून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे तर काढलेला गाळ शेतामध्ये पडून शेत जमिनीचा पोत सुधारून शेतकऱ्यांच्या उत्पनात भर पडणार आहे.
वाई तालुक्यातही काही कामांना प्रशासकीय मंजुऱ्या मिळाल्या असूनही वाई महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून म्हणावी अशी जनजागृती केली गेली नसल्याने वाई तालुक्यात जलसंधारण लोक चळवळ उभीच राहिली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळेच तालुक्यात गाळमुक्त व गाळयुक्त शिवार योजनेला सध्यातरी खीळ बसल्याचे पाहावयास मिळत आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.
वाई तालुक्यात मातीचे व सिमेंटचे बंधारे, नाला बांधसह लहान मोठे जवळपास चारशे तलाव असून ते गाळाने पूर्णपणे भरून गेलेले आहेत. या सर्व तलावातील गाळ काढला गेल्यास काही प्रमाणात पाणी टंचाईवर मात करता येईल. परंतु महसूल विभाग मात्र आपला काही संबंध नसल्याची भूमिका बजावत आहे. त्यामुळे एप्रिल महिना संपला तरी वाईत गाळयुक्त शिवार योजनेच्या कामास गती मिळत नाही. तसेच काही तलावातील गाळ गावच्या पुढाऱ्यांनी महसूल विभागाच्या संगनमताने वीटभट्टी मालकांना बिनबोभाट विकून मनमानी वसूल गोळा करून चांगली हातसफाई केल्याची चर्चा ग्रामस्थातून केली जात आहे.
गेली कित्येक दिवस महसूल वाई उपविभाग कार्यालयात जवळपास प्रत्येक कामात सरकारी काम सहा महिने थांब याची प्रचिती सर्व वाईकर जनतेला चांगलीच अनुभवयास मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वाई तालुक्यातील जनतेच्याप्रती वाई महसूल विभाग संगीत खुर्ची खेळत असल्याची तीव्र व संतप्त प्रतिक्रिया उमटत असून मंदावलेली जनकल्याणाची ही संगीत खुर्चीला गतिमान करण्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.