आणखी वाताहत होण्याची भीती : अजित पवारांनी लक्ष घालण्याची गरज
पिंपरी – शहरात एकेकाळी एकहाती वर्चस्व गाजविणाऱ्या राष्ट्रवादीची वाटचालही आता कॉंग्रेसच्या दिशेने सुरू असल्याचे बोलले जात आहे. शहरातील पक्षसंघटन कायम ठेवण्याबरोबरच नव्याने उभारी घेण्यासाठी अजित पवार यांनी लक्ष घालण्याची गरज असतानाही त्यांची नाराजी हटण्याचे नाव घेत नाही. नेत्यांमध्ये धुसफूस कायम आहे. त्यातच स्वार्थासाठी काहीजणांनी सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाण्यातच धन्यता मानल्याने पवार पक्षाची नव्याने मोट बांधणार की, नाराजी कायम ठेवणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरावर सध्या भाजपाचे वर्चस्व आहे. विशेष म्हणजे ज्या नेत्यांना राष्ट्रवादीने व विशेषत: अजित पवार यांनी मोठे केले त्यांनीच पक्षाला शहरातून हद्दपार करण्याचा विडा उचलला आणि गेल्या पाच वर्षांत त्यामध्ये यशही मिळविले. सध्या राष्ट्रवादीचा शहरात एकही आमदार नसून महापालिकेत केवळ 36 नगरसेवक आहेत. त्यापैकी बोटावर मोजण्याइतकेच पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे पक्षातून सांगितले जात आहे.
एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रकार सत्तेतून हद्दपार झाल्यानंतरही चालू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांचा मानहानीकारक पराभव झाल्यामुळे अजित पवार हे शहरातील नेत्यांवर नाराज असल्याचे सांगितले जात होते. त्यातच गेल्या अडीच महिन्यांपासून पवार शहरातील संघटनेपासून दूर गेल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
ठराविक नगरसेवक व पदाधिकारी वगळता इतरांनी ठेकेदारी, स्वहित आणि आपल्या भवितव्याचा मार्ग शोधत सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधण्यातच धन्यता मानल्याचे पक्षापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतरही पक्ष पातळीवरील संघटन मजबूत होण्याऐवजी ते अधिकच विस्कळीत होऊ लागल्याने शहरातील पक्षाच्या भवितव्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कॉंग्रेसकडेही वरिष्ठ नेत्यांनी दूर्लक्ष केल्यामुळे हा पक्ष शहरातून जवळपास हद्दपार झाला. त्याच दिशेने राष्ट्रवादीचीही वाटचाल सुरू असल्याचे बोलले जात आहे.
पार्थ यांच्या पराभवाला “धुंदी’ कारणीभूत
पार्थ पवार यांची पहिली निवडणूक असतानाही लोकांना ग्रहीत धरून स्वत:च्या धुंदीत राहून राबविलेली प्रचार यंत्रणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष अनेक राजकीय विश्लेषकांनी काढला आहे. खुशमस्कऱ्यांनी पवारांना गाफील ठेवताना विजयाचा अतिआत्मविश्वास दाखविल्याने तसेच स्वत: पवार यांनीही पार्थ यांची प्रचार यंत्रणा राबविताना घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. “लाटे’मध्येही पार्थ यांना पाच लाखांच्या आसपास मते पडली. अधिक चांगले निर्णय घेऊन या मतांमध्ये वाढ केल्यास राष्ट्रवादीला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात.
…तर पक्षाला चांगले दिवस
शहरात शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आजही आहे. चुकीची धोरणे, स्वकियांपेक्षा ज्यांनी आजपर्यंत दगाफटका केला त्यांच्यावर ठेवला जाणारा विश्वास आणि अतिआत्मविश्वासा बरोबरच अंतर्गत कलह या बाबी राष्ट्रवादीला आणि या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना आजपर्यंत भोवल्या आहेत. सत्ताधाऱ्यांबरोबरच दोन हात करण्याबरोबरच स्थानिक नव्या कार्यकर्त्यांसोबत जुन्यांची योग्य पद्धतीने मोट बांधल्यास विधानसभा निवडणुकीत या पक्षाला चांगले यश मिळू शकते, असा विश्वास अनेकजण व्यक्त करतात.