तहसीलदार अर्चना पाटील यांचे शासकीय अधिकारी व ग्राहक पंचायत मासिक बैठकीत आवाहन
वडूज – खटाव तालुक्यात ग्राहक पंचायतीचे नेटवर्क उत्तम असून ग्राहकांचे प्रश्न सुटण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी वर्गाने मासिक बैठकीस उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन खटाव तालुक्याच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी केले.
खटाव तहसील कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात शासकीय अधिकारी व ग्राहक पंचायत यांची मासिक बैठक आज संपन्न झाली याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन तहसीलदार पाटील बोलत होत्या. यावेळी ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष प्रा. डॉ. पी. डी. कुलकर्णी, गो. ज. कुलकर्णी, नागनाथा स्वामी, पुरवठा विभागाचे श्रीकांत शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संध्याकाळी सातची वडूज- मुंबई एस. टी. बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत तरी ती बस पूर्ववत सुरू करावी. तसेच सातारा- सोलापूर या बसेस पूर्ववत पुसेगाव- खटाव- वडूज- दहिवडी – सोलापूर मार्गे सुरू कराव्यात अशी एकमुखी मागणी सदस्यांनी केली. संबंधित अधिकारी उपस्थित नसल्यामुळे प्रश्नाला उत्तर मिळाले नाही.
खटाव तालुक्यात बी. एस. एन. एल. चे इंटरनेट कनेक्शन अत्यंत विक असल्याने सर्व ग्राहकांना विविध समस्याना सामोरे जावे लागत आहे. बी. एस. एन. एल. ची बिले सध्या एस. एम. एस. अथवा मेलच्या द्वारे ग्राहकांना मिळत आहेत. या सुधारणेबाबत संबंधित विभागाचे अभिनंदन करण्यात आले. पण बिल भरताना नेटवर्क विक आल्याने बिल भरण्यास अडचणी येत असल्याने विलंब शुल्क द्यावे लागते तरी दूरध्वनी विभागाने अडचणी येणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. याबाबत उत्तर देताना एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले, ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. इथून पुढे ग्राहकांना समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
वडूज येथे पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सोसावा लागत असतो याबाबत सदस्यांनी समस्या मांडल्या. प्रास्ताविक प्रा. डॉ. पी. डी. कुलकर्णी यांनी केले. आभार नागनाथ स्वामी यांनी मानले. यावेळी सुभाष घाडगे, नारायणराव पाटील, बी. एस. एन एल. चे. एस. व्ही. कुलकर्णी, स्टेट बॅंक ऑफ इंडिया वडूजचे मेटकरी, धीरज जाधव, ज्ञानेश्वर कुंभार, प्रताप घाडगे तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.