नवी दिल्ली – देशभरातून मला अनेक पक्षांकडून ऑफर्स आल्या होत्या. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाकडून देखील पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली होती. त्याशिवाय अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील अनेक पक्षांकडून ऑफर्स मिळाल्या होत्या. परंतु खूप विचार केल्यानंतर मी कॉंग्रेसचा हात धरला, असे “बिहारी बाबू’ आणि नुकताच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. कॉंग्रेस प्रवेशाबाबत सिन्हा म्हणाले, आपण ही गोष्ट विसरु नये की, कॉंग्रेस हा देशातला सर्वात मोठा आणि सर्वात जुना पक्ष आहे. कॉंग्रेसने देशाच्या विकासासाठी खूप काम केले आहे. आता कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर मीसुद्धा काहीतरी करु शकेन.
सिन्हा म्हणाले की, राजकारणाचं दुसरं नाव तडजोड आहे. जे काल होतं ते आज नाही. जे आज आहे ते उद्या नसणार. माझं तिकीट कापण्यापूर्वी भाजपने मला एकदाही विचारण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळेच मला पक्ष सोडावा लागला. यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका केली.