ढोलपुर – कॉंग्रेसने देशातील गरीब लोकांसाठी आणलेली न्याय योजना ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या इंजिनाला डिझेल पुरवण्याचे काम करील असा विश्वास कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. आज येथील प्रचार सभेत बोलतातान त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की लोकांनी नरेंद्र मोदींचे पंधरा लाख मिळतील म्हणून मोठ्या प्रमाणावर बॅंकांमध्ये खाती उघडली. पण त्यांच्या खात्यांवर एक पैसाही आला नाही. आता आम्ही या खात्यांवर पाच वर्षात किमान 3 लाख 60 हजार रूपये टाकू असे ते म्हणाले.
देशात मोदींच्या काळात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही सरकारी सेवांमधील 22 लाख पदे एका वर्षात भरून तितक्या युवकांना नोकरी देऊन त्यांचा रोजगाराचा प्रश्न सोडवू असेही त्यांनी यावेळी सांगितले. देशातील बेरोजगारीचे प्रमाण गेल्या 45 वर्षातील सर्वात भीषण प्रमाण ठरले आहे. सरकारी सेवांमध्ये लाखो जागा रिक्त आहेत आम्ही या जागा भरून युवकांना काम देऊ असे ते म्हणाले.