पतियाळा – पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या दाव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सिंग यांनी भाजपाच्या त्या दाव्याचा हवाला देत भाजपावर शरसंधान साधले आहे. मोदी म्हणतात, सीमेपलीकडे जाऊन पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. पण मोदींना इतिहास माहीत करून घेण्याची गरज आहे.
सिंग म्हणाले, भाजपाला इतिहासाची माहिती नाही. आधीही बऱ्याचदा सर्जिकल स्ट्राईक झाले आहेत. जेव्हा 1964 ते 1967 मध्ये मी वेस्टर्न कमांडवर होतो, त्यावेळी जवळपास 100 स्ट्राईक झाले आहेत. त्यांनी फक्त त्या स्ट्राईकला सर्जिकल स्ट्राईक असे नाव दिले आहे. आम्ही याला क्रॉस बॉर्डर रेड म्हणतो. वर्ष 1947 मध्ये कोण पंतप्रधान होते. 1962 मध्ये कोण पंतप्रधान होते. तसेच 1965 आणि 1972 मध्ये कोण पंतप्रधान होते.
आम्हीच पाकिस्तानचे तुकडे केले आहेत. इंदिरा गांधींनी हे सर्व केले. परंतु त्यांनी कधीही म्हटले नाही की मी केले. त्यांनी त्यावेळी फक्त एवढेच म्हटले होते की, भारतीय सेना आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशांची मी आभारी आहे. त्यांनी दुसऱ्यांना श्रेय दिले. पण ही व्यक्ती म्हणते मी हे केले? ही तुमची सेना नाही. ती भारताची सेना आहे. एकतर त्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव आहे. अन्यथा ते जाणूनबुजून असे बोलत असावेत. त्यांना सर्व माहिती देण्यासाठी सरकार असल्याचेही अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले आहे.