लखनौ – उत्तरप्रदेशातील महागठबंधन आता पुर्णपणे विस्कळीत झाले असून सपा. बसपाबरोबरच या आघाडीतील राष्ट्रीय लोकदलानेही स्वबळाचा नारा दिला आहे. उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या अकरा पोटनिवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय आज या पक्षाचे उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष मसूद अहमद यांनी जाहीर केला आहे. तथापी त्यांनीही भविष्यात गठबंधन कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.
महागठबंधन मध्ये आम्ही समाजवादी पक्षाबरोबर होतो आणि आम्हाला लोकसभेत त्यांच्या कोट्यातील जागा लढण्यासाठी मिळाल्या होत्या अशी माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. उत्तरप्रदेशातील भविष्यातील महागठबंधन मध्ये कॉंग्रेसचाही समावेश केला पाहिजे अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्रीतपणे आव्हान निर्माण करण्याची गरज आहे. त्यासंबंधात पुढील काळात विचार होऊ शकतो असे ते म्हणाले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत आरएलडी पक्षाने महागठबंधन मध्ये तीन जागा लढवल्या होत्या पण या तिन्ही ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. या पक्षाचे अध्यक्ष अजितसिंह हे मुज्जफरनगर मधून, त्यांचे पुत्र जयंत चौधरी हे बागपत मधून तर कुवॅंर नरेंद्रसिंह मथुरेतून निवडणूक लढवत होते पण ते तिघेही पराभूत झाले आहेत.