नवी दिल्ली – गेली अनेक वर्ष अयोध्या प्रकरणात काहीच नवीन हालचाल झाली नसून आता या प्रकरणाची त्वरीत सुनावणी घेऊन ती पुर्ण करा अशी मागणी करणारी याचिका या प्रकरणातील एका वादीने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या प्रकरणातील वादी गोपाल सिंह विशारद यांनी ही याचिका सादर केली आहे.
त्यांच्यावतीने त्यांची बाजू मांडताना त्यांचे वकील पी. एस. नरसिंहा यांनी नमूद केले की प्रकरणातील जमीनीच्या मालकी हक्काचे वाद न्यायालयाने प्रथम तातडीने सुनावणीला घ्यावा. या प्रकरणी मध्यस्थांमार्फत तोडगा काढण्यासाठी तीन जणांची एक समिती न्यायालयाने नेमली आहे.
त्यानंतर या प्रकरणात काहीच हालचाल झालेली नाही असेही नरसिंहा यांनी सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे आज झालेल्या सुनावणीच्यावेळी नमूद केले.