डुंगरपुर,(राजस्थान) – मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात समाजातील अनेक घटकांवर अन्याय केला. त्यांच्या काराभारामुळे उपेक्षित राहिलेल्या घटकांना कॉंग्रेस पुढील पाच वर्षात न्याय देईल असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. ते आज येथे पक्षाच्या प्रचार सभेत बोलत होते. कॉंग्रेस सत्तेवर आल्यास पुढील एका वर्षात सरकारी नोकरीच्या 22 लाख जागा भरून तरूणांना खात्रीचा रोजगार मिळवून देईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की मोदींनी केवळ त्यांच्या 15-20 उद्योगपती मित्रांसाठीच आपले सरकार चालवले. गरीबांना ते विसरले. अदिवासींची त्यांनी उपेक्षा केली. त्याच्या राजवटीत अनेकांचे रोजगार बुडाले अनेक जण बेरोजगार झाले. पण त्यांनी बेराजगारीची आकडेवारीच लपवून ठेवली. राजस्थानातील जनतेने सहा महिन्यापुर्वी झालेल्या विधानभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला सत्ता दिली. आम्ही येथील शेतकऱ्यांना दहा दिवसात कर्जमुक्त केले असे ते म्हणाले. आता लोकसभा निवडणुकीतही या राज्यातील जनता कॉंग्रेसच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.