नवी दिल्ली (पीटीआय) – ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील कथित मध्यस्थी सुशेन मोहन गुप्ताद्वारे दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जाचा अंमलबजावणी संचालनालयातर्फे विरोध करण्यात आला. यावेळी “ईडी’च्या विशेष सरकारी विकीलांनी सोमवारी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांना सांगितले की, ”विजय माल्या आणि नीरव मोदीसह एकून ३६ व्यापारी देशातून फरार आहेत. याचप्रमाणे ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील आरोपी सुद्धा देशातून फरार होण्याची शक्यता असल्याने त्यांचा जमीन मंजूर करून नये.”
दरम्यान, तपास यंत्रणेचे विशेष सरकारी वकील डी पी सिंह आणि एन के मट्टा यांनी कथित मध्यस्थी सुशेन मोहन गुप्ता यांच्या दाव्यांवर विरोध करत विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांना सांगितले की,”माल्या, ललित मोदी, मेहुल चौकसी, नीरव मोदी आणि संदेसरा बंधु ( स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड च्या प्रवर्तक) समाजात अधिक खोलवर ओळख असतांना सुद्धा त्यांनी देश सोडले. यांच्यासारखे एकूण ३६ व्यापारी देशातून फरार झाले आहेत.” ईडीच्या सरकारी वकील संवेदना वर्मा यांनी ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणा बाबत न्यायाल्यात सांगितले की तपास अंतिम टप्प्यात असून मुख्य आरोपीच्या शोध घेत आहे. या प्रकरणात न्यायालयाने सुशेन मोहन गुप्ताद्वारे दाखल जामीन अर्जावर 20 एप्रिल पर्यंत निर्णय राखीव ठेवला आहे.