शरद पवारांचा गौप्यस्फोट: मित्रपक्ष व तज्ज्ञांशी बोलून लवकरच घेणार निर्णय
मुंबई- लोकसभा निवडणूकीदरम्यान ईव्हीएमवर विरोधकांनी शंका उपस्थित केली असतानाच आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नवीन गुगली टाकली आहे. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट मशीनमध्ये काहीच गडबड नसून ती निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये आहे. मतमोजणी करताना संबंधित अधिकाऱ्यांच्यासमोर असलेल्या मशीनमध्ये गडबड झाली असल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी केला. यासंदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही देशभरातील मित्र पक्ष आणि तज्ज्ञांशी बोलून याविषयी येत्या काळात निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 20व्या वर्धापनदिनानिमीत्त आज मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुख्य कार्यालयापासून जलदिंडी काढण्यात आली. तिचा समारोप यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला. त्यावेळी झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते.
मतमोजणी करताना एक अधिकारी बसतो, त्या अधिकाऱ्याच्या समोर एक मशीन असते. तिथे त्यातून ईव्हीएम व व्हीव्हीपॅट अशा दोन्ही मशीनची मतमोजणी होते. इथून तिथे काय गेले, हे कोणाला कळत नाही. ही गडबड तिथे आहे, असे पवार म्हणाले. तुम्ही ज्यावर बटन दाबले, त्याची चिट्टी दिसली, त्यावर तुमचे समाधान झाले हे इथपर्यंत बरोबर होते. या दोन्हीमध्ये काही गडबड नव्हती. यासंदर्भात मला काही एक्सपर्टनी याविषयी माहिती दिली. पण ज्या ठिकाणी मशीनमध्ये मतमोजणी झाली त्यात खरी गडबड आहे, याकडे पवारांनी लक्ष वेधले.
देशाचे नेतृत्व करणाऱ्या घटकांना सर्वाना समोर घेऊन जाण्याच्या संकल्पनेला तिलांजली द्यायचं आहे. म्हणूनच बॉम्ब स्फोटासारखे आरोप असलेली लोक आता संसदेत आणले आहेत. जगात आधुनिकता याला स्थान दिले जात असताना देशाचे पंतप्रधान भगवे वस्त्र घालून गुहेत बसतात. लोकांच्या मनात जाणीवपूर्वक राष्ट्रवादाचा मुद्दा आणून देशात धार्मिक ध्रुवीकरण केले. त्याचा त्यांना राजकीय फायदा मिळाला, असेही पवार म्हणाले.
निवडणुकीच्या काळात आपण नोटाबंदी, 15 लाख रुपयांवर बोलत राहिलो. पण त्यांनी लोकांच्या मनावर खोटे चित्र रंगवले. पाकिस्तानला घरात घुसून मारू असे म्हणणारे निवडणूकीनंतर कसे शांत झाले, हे आता देशातील लोक पाहत आहेत.
यंदा संसदेत भगवे विचार मांडणाऱ्या लोकांची संख्या जास्त असणार आहे. त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे खटले जास्त असणारे, मालेगाव बॉम्बस्फोटामधील आरोपीही आहेत. राजकारणात किंवा समाजकारणात काम करणाऱ्या लोकांवर खटले असतात. परंतु असे खटले म्हणजे एकप्रकारे सन्मानचिन्ह आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचा चेहरा ग्रामीण केला आहे तो आता शहरीही झाला पाहिजे. राज्यात 50 टक्के लोक नागरी भागात असतात. प्रत्येक तालुक्यात नागरिकरण झालेले आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण यशस्वी होणार नाही. नागरी भागात पक्षाची व्याप्ती वाढविण्यासाठी भर द्या, नागरी प्रश्नासाठी संघर्ष करण्यासाठी जनमानस तयार करा, असे आवाहन पवारांनी केले.
आज नागपूर, चंद्रपुरातही 50 टक्के लोक हिंदी बोलत आहेत, त्या लोकांना सोबत घेणे आवश्यक आहे. यासाठीच मुंबईत आपल्या कामाचा विस्तार वाढवायचा आहे. मुंबई हे कॉस्मोपोलिटीन शहर आहे. मुंबईचे नेतृत्व हे इतर राज्यातील लोकांनी केले, त्याचा लोकांनी स्वीकार केला होता याची जाणीव करून देत मुंबईत सगळ्या घटकांना सोबत घेऊन जला हवे, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला
कंपन्याच करतात सेटींग
मतदान करता येणाऱ्या मशीन देशात दोनच कंपन्या बनवतात. त्यात एक केंद्र सरकारच्या ऑटोमिक एनर्जीची आणि केंद्राची आणखी एक कंपनी याची निर्मिती करते. याच कंपन्या यामध्ये सेटिंग करतात. हे सेटिंग्ज करायला आठ ते दहा लोक लागतात, त्यापेक्षा अधिक लागत नाहीत. हे लोक संबंध देशाचे काम काही तासात करू शकतात हे इतके सोपे आहे, असा आरोप करतानाच यासंदर्भात आम्ही वस्तुस्थिती जाणून घेण्याचे काम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
तरूणांना संधी देण्याची गरज
सुरुवातीला सत्ता असताना तरुण वर्ग आपल्याकडे होता. आज ही नवी पिढी, तरुण किती प्रमाणात आहे, असा सवाल उपस्थित करतानाच या तरुणपिढीकडे लक्ष दिले नाही त्यांची काळजी नाही घेतली नाही तर काय होईल याचा विचार पक्षात व्हायला हवा. आता तरुणांना संधी देण्याची गरज आहे. लोकांना बदल हवा असतो. अनुभवी लोकांसोबत तरुणांची संख्या असली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा तरुण पिढी हवी. त्यामुळे आतापासूनच निवडणूकांची तयारी करायला लागा असे आवाहन शरद पवार यांनी केले. आज सोशल मिडिया समाजमाध्यम झाले आहे. त्यावरुन सहज लोकांपर्यंत पोचता येते. याचा आधार घेण्याची गरज आहे. फार लवकर पोचण्याची साधने आहेत. त्याकडे लक्ष दिले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.