संगमनेर – मालुंजे व पंचक्रोशितील वाड्या-वस्त्यांच्या पाण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सुमारे दोन कोटी 76 लाख रुपयांच्या निधीतून कार्यान्वित होणाऱ्या या योजनेमुळे गेली अनेक वर्षे तहानलेल्या गावांना दिलासा मिळाला आहे. या योजनेसाठी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
मालुंजे व पंचक्रोशितील गावांचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला होता.कोणतीही शाश्वत योजना गावासाठी कार्यान्वित नसल्याने ग्रामस्थ पाण्यापासून वंचित होते. मालुंजे ग्रामपंचायतीने पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, म्हणून गृहनिर्माणमंत्री विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता.
शासनस्तरावर ना. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालुंजे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी या योजनेस तत्काळ मंजुरी दिली. योजनेला आता प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे.