ज्योतिरादित्य शिंदे: सरकार स्थापण्यासाठी कॉंग्रेसला आणखी मित्रांची गरज भासेल
भोपाळ – लोकसभा निवडणुकीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे भाकीत कॉंग्रेसचे तरूण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी केले. त्याचवेळी समविचारी पक्षांना बरोबर घेऊन कॉंग्रेस सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी त्यासाठी पक्षाला आणखी मित्रांची गरज भासेल, असेही सूचित केले.
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ज्योतिरादित्य बोलत होते. जनतेचा सध्याचा मूड मोदी सरकारच्या विरोधात आहे. त्यामुळे पुढील सरकारच्या स्थापनेत कॉंग्रेसचा पुढाकार असेल. पुढील सरकार यूपीएचे किंवा यूपीए प्लस प्लस असे असेल, असे त्यांनी म्हटले. पुढील काळही आघाडी सरकारांचाच असेल, असेही त्यांनी नमूद केले. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वाभाविकपणे आमचे पंतप्रधानपदासाठीचे पर्याय आहेत. मात्र, त्याविषयीचा अंतिम निर्णय यूपीएचे घटक पक्ष घेतील. केवळ एका व्यक्तीला पुढे करणाऱ्या भाजपसारखे आम्ही नाही. सर्वांना बरोबर घेऊन एकत्रितपणे कार्य करण्यावर आमचा विश्वास आहे, अशी भूमिका ज्योतिरादित्य यांनी यावेळी मांडली.