बिहारच्या बाहेर जेडीयूने घेतली “एनडीए’सोबत फारकत
चार राज्यांमधील आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार
पाटणा – लोकसभा निवडणूकीनंतर मंत्रीमंडळातील जागा वाटपावरून नाराज झालेल्या नितिश कुमार यांनी आता स्वबळाचा नारा दिला आहे. यापुढे जनता दल युनायटेड (जेडीयू) बिहारच्या बाहेर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष म्हणुन राहणार नाही. तसेच जम्मू-काश्मीर, झारखंड, हरियाणा आणि दिल्ली येथे होणा-या आगामी विधानसभा निवडणुका देखील स्वतंत्रपणे लढणार आहे. हा निर्णय रविवारी पाटणा येथे पार पडलेल्या जेडीयूच्या कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
या बैठकीस मुख्यमंत्री नितीश कुमार, पक्षाचे वरिष्ठ नेते प्रशांत किशोर, नारायण सिंह व केसी त्यागी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत पक्षाची पुढील वाटचाल कशी राहील यावर चर्चा करण्यात आली. यापुढे जेडीयू बिहार राज्याबाहेर कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नाही. तसेच जम्मू-काश्मीर, झारखंड, हरियाणा आणि दिल्ली येथे होणा-या विधानसभा निवडणुकीत पक्ष स्वबळावर लढणार आहे. या राज्यांमधील पक्षाच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली.
दरम्यान, या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात जेडीयूच्या खासदारांना मंत्रीपद घेऊ देण्यास नितीश यांनी नकार दिला होता. तर पक्षाच्या या बैठकीत नितीश कुमार काहीतरी मोठा निर्णय घेतील ही अपेक्षा होतीच. त्यानुसार त्यांनी एनडीएला धक्का देत स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे. खरेतर त्यांनी शुक्रवारी सांगितले होते की, भाजपबरोबरचे आमचे संबंध पुर्वीप्रमाणेच चांगले राहणार आहेत. एनडीए आघाडीतील त्यांचा सहभाग कायम राहिल, असे त्यांनी सांगितले होते.