पाटणा- बिहारमधील वृद्धांसाठी एका नव्या सार्वत्रिक पेन्शन योजनेची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार केली आहे. “मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजना’ (एमव्हीपीवाय) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना मिळणार आहे. तसेच माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या वयोवृद्ध पत्रकारांना देखील याचा फायदा होणार आहे.
या योजनेची माहिती नितीश कुमार यांनी दिली. या योजनेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2019 पासून करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वय व पात्र असलेल्या सर्वांना मासिक 400 रूपये, तर 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्याना 500 रूपये प्रति महिना दिला जाणार आहे. मात्र, शासकीय सेवानिवृत्त असलेल्या वयोवृद्धांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
या योजनेची घोषणा केल्यानंतर नितीश कुमार म्हणाले, या योजनेसाठी राज्य सरकारने 18 हजार कोटी रुपयांचा विशेष निधी राखीव ठेवला आहे. आम्ही गरीब वृद्धांचा आदर व सन्मान करणार आहोत. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत जवळपास दोन लाख जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत, तर 35 ते 36 लाखांपर्यंत अर्जाचा आकडा जाईल अशी सरकारला अपेक्षा आहे.
सध्या वृद्धांसाठी असलेली पेन्शन योजना केवळ मागास प्रवर्गालाच लागू आहे. याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पत्रकारांना सहा हजार रुपये पेन्शन जाहीर केले आहे. जे पत्रकार सध्या माध्यमांमध्ये कार्यरत आहेत आणि ज्यांना कोणतेही पेन्शन मिळत नाही ते “बिहार पत्रकार सन्मान योजने’च्या लाभास पात्र असणार आहेत. ही योजना 1 एप्रिलपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.