मुंबई – मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी महात्मा गांधींजींबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर त्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावरून केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका होत असून त्यांच्या निलंबनाचीही मागणी होत होती मात्र निलंबित न करता त्यांची मुंबई महापालिकेतून थेट मंत्रालयात बदली करण्यात आली. यामुळे काँग्रेस प्रदेश महिला अध्यक्षा चारुलता टोकस यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानामागे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे लक्ष करत सवाल विचारले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा निषेध करीत टोकस म्हणाल्या,निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानामागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधाराच आहे. त्यामुळेच अशा संतापजनक विधानानंतर त्यांची मुंबई महापालिकेतून थेट मंत्रालयात बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीला सरकारने केलेली कारवाई म्हणावे की बक्षिसी म्हणावे, असा प्रश्न पडल्याचा आरोप प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा निषेध करीत टोकस म्हणाल्या, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधीजींचे योगदान मोठे आहे. जगभर त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा ठसा उमटला आहे. अशा या महान व्यक्तीबद्दल वाटेल तशी विधाने करून त्यांचा अपमान करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. याचा बोलविता धनी कोण आहे, याचा शोध घ्यायला हवा.